पुणे :- ( दैनिक शिवसंग्राम न्यूज पोर्टल )
पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजे १० मार्चनंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, असे भाकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तविले आहे. १० मार्चनंतर महाविकास आघाडी सरकारला सत्ता सोडावी लागेल. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले आहेत. सरकारमधील मंत्री एकापाठोपाठ तुरुंगाच्या दिशेने जात आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल १० मार्च रोजी लागल्यानंतर अशी स्थिती निर्माण होईल की महाविकास आघाडीला सत्तेवरून जावे लागेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. ते शनिवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
गेल्या काही दिवसांत महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडावर आले आहेत. अनिल देशमुख यांच्यापाठोपाठ संजय राऊत आणि अनिल परब हे देखील तुरुंगात जातील, असे भाजप नेते सातत्याने सांगत आहेत.काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांनी महाविकासआघाडी सरकार पाडण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात असल्याचे म्हटले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही केंद्रीय तपासयंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांवर दबाव वाढवून सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु असल्याचा दावा केला होता. जेणेकरून यापैकी एक पक्ष भाजपमध्ये जाईल किंवा तिन्ही पक्षांमध्ये फूट पडेल, असे प्रयत्न सुरु असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले होते. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांचं भाकीत खरं ठरणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.